अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी पाणी वाचवण्याचे आवाहन नागरिकांना करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर अंघोळीची गोळी संस्था उभारलेली आहे. पाणी बचतीचे आणि संवर्धनाचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी संस्थेच्या टीम मुंबईतील ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालय येथे जाऊन पाण्याचे महत्व पटवून देत असते. ह्याच अंघोळीच्या गोळीच्या टीमने नुकतेच कल्याण शहरांतील झाडांवरील बॅनर, पोस्टर काढण्याचा सुत्य उपक्रम पार पाडला. खिळेमुक्त झाडं संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम राबवला. गेल्या वर्षभरापासुन हा उपक्रम मुंबईतील विविध भागात राबविला जात आहे. वृक्ष संवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे त्यामुळे खिळेमुक्त झाडं हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा असे आवाहन अंघोळीची गोळी संस्थेचे ठाणे जिल्हा समन्वयक सागर वाळके यांनी यावेळीं केले.
पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी अंघोळीची गोळी टीम मुंबई प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न चालु आहे असे खिळेमुक्त झाडं मोहिमेचे मुंबई जिल्हा समन्वयक तुषार वारंग यांनी यावेळीं सांगितले. कल्याण शहरांत मोहिमेत प्रणिल मिसळे, स्वप्नील शिरसाठ, भुषण राजेशिर्के, रोहीत जगताप या युवकांनी अंघोळीची गोळी संकल्पना आणि खिळेमुक्त झाडं अभियानाची गरज उपस्थितांना समजावुन सांगितली. वृक्ष संवर्धनासाठी अनेक महानगरपालिकांसोबत आमचा पत्रव्यवहार चालु आहे अशी माहीती यावेळी खिळेमुक्त झाडं मोहिमेचे ठाणे जिल्हा समन्वयक अविनाश पाटील यांनी सांगितले. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरा संरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे असेही ते यावेळी म्हणाले. मोहिमेत प्रामुख्याने वडाच्या झाडांना गुंडाळण्यात आलेले धागेदोरे काढण्यात आले वडाच्या झाडांना कचरा टाकण्याचे ठिकाण बनवण्यात येवु नये यांसाठी सर्वांनी मिळुन काम करण्याची गरज आहे असेही या युवकांनी यावेळीं सांगितले. प्रहार अकॅडमीचे अनेक बॅनर यावेळीं झाडांवरून काढण्यात आले.